जळगावातील तुटलेल्या नाल्यांच्या कठड्यांवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर मनोज चौधरी यांचे मनपा बांधकाम विभागाला निर्दे
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील लहान-मोठ्या नाल्यांवरील तुटलेले किंवा गायब झालेल्या संरक्षक कठड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे पूर्णपणे तुटल्याचे निदर्शनास आले असून, शहरातील इतर अनेक ठिकाणीही अशीच धोकादायक परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. सध्या पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. या मार्गांवरून दररोज शाळकरी मुले, स्कूल बस, रिक्षा आणि हजारो नागरिकांची ये-जा होत असते.
गेल्या काही दिवसांत तुटलेल्या कठड्यांमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना लक्षात घेता, भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून फॅब्रिकेशनच्या माध्यमातून तात्पुरते अथवा कायमस्वरूपी संरक्षक कठडे उभारण्याच्या सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिल्या आहेत.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले, “नागरिकांचा, विशेषतः लहान मुलांचा जीव मोलाचा आहे. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम सुरू करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.”
