जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे आयोजित २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धात्मक व शैक्षणिक परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या एकूण 110 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रमोद चिंधू लाड, रवींद्र पोळ, डॉ. विजय गरकल, डॉ. अश्विनी जायभाये, रमेश लाडवंजारी, चंद्रकांत लाडवंजारी, सहायक आयुक्त गणेश चाटे, नशिराबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, नगरसेविका निकिता लाडवंजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. विजय गरकल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि मोठे ध्येय ठेवून सातत्याने परिश्रम करण्याचा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश वराडे यांनी समाजात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करत, समाजातून तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक व लोकाभिमुख अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी मोक्षदा राहुल लाडवंजारी व खुशबू भानुदास नाईक यांनी मनोगत व्यक्त करून संघटनेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड व प्रणाली नाईक यांनी केले.
समारोपप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले की, यंदा छापील निमंत्रणाऐवजी व्हॉट्सअॅपद्वारे डिजिटल निमंत्रण देण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व समाजबांधव उपस्थित राहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वंजारी युवा संघटनेचे पदाधिकारी, भगवान सेनेचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षणाला प्रोत्साहन देत नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
