सह्याद्रीच्या कडाकडांतून ज्यांच्या नावाचा आजही जयघोष ऐकू येतो, ज्यांच्या पराक्रमापुढे आभाळही ठेंगणे वाटते, असे ‘प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणजे केवळ एक नाव नाही, तर एक जळजळते चैतन्य आहे.

आजच्या दिवशी शिवनेरीवर सूर्याचा एक तेजस्वी किरण पडला आणि महाराष्ट्राच्या अंधारलेल्या नशिबाचा उदय झाला. तो दिवस म्हणजे शिवजयंती..
सह्याद्रीच्या उत्तुंग कडांवरून जेव्हा वारं वाहतं, तेव्हा आजही त्या वाऱ्यात एकाच नावाचा दरारा आणि मायेचा ओलावा जाणवतो ते नाव म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’.

महाराज म्हणजे केवळ इतिहासाचं एक पान नव्हे, तर या मातीचा श्वास आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. ज्या काळात रयतेवर अस्मानी आणि सुलतानी संकटं घोंघावत होती, त्या अंधकारात शिवनेरीवर स्वराज्याचा सूर्य तळपला आणि गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेल्या काळजांना स्वातंत्र्याची स्वप्नं पडू लागली.

महाराजांचे स्वराज्य हे कोणा एका जातीचे वा धर्माचे नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने ‘रयतेचे राज्य’ होते. समाजातील बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या माणसांना एकत्र गुंफून त्यांनी निष्ठेची एक अभेद्य भिंत उभी केली. हातांत राबण्याचे कसब असणाऱ्या कष्टकऱ्यापासून ते तलवारीची धार पेलणाऱ्या मावळ्यापर्यंत, प्रत्येकाला या स्वराज्यात स्वतःचे घर वाटू लागले. माणसाच्या जातीपेक्षा त्याच्या कर्तृत्वाला आणि इमानाला महाराजांनी सर्वोच्च स्थान दिले. म्हणूनच, त्यांच्या स्वराज्यात घामाचा थेंब गाळणारा शेतकरी आणि रक्ताचे पाणी करणारा सैनिक, दोघेही तितक्याच सन्मानाने जगत होते.

शिवरायांच्या चरित्राचा सर्वात तेजस्वी पैलू म्हणजे त्यांनी जपेलेला ‘समधर्म समभाव’. महाराजांची तलवार कधीही धर्माच्या नावावर कोणा निरपराधावर उठली नाही. त्यांच्या नजरेत रयतेचा कोणताही भेदभाव नव्हता. “हे स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” असे म्हणताना त्यांनी ईश्वरी अधिष्ठान दिले, पण ते मांडताना सर्वांच्या श्रद्धांचा आदर राखला. शत्रूच्या छावणीतील पवित्र ग्रंथाचा सन्मान करणे असो किंवा आपल्या सैन्यातील निष्ठावंत मुस्लिम वीरांवर विश्वास टाकणे असो, महाराजांनी नेहमीच माणुसकीचा धर्म जोपासला. स्त्रियांचा आदर हा तर त्यांच्या स्वराज्याचा पाया होता; मग ती स्त्री स्वतःच्या स्वराज्यातील असो वा परक्या शत्रूच्या गोटातील, तिला मातेचा दर्जा देणे हाच शिवरायांचा संस्कार होता.

आज शिवजयंती साजरी करताना केवळ घोषणांचा जयघोष करून चालणार नाही, तर महाराजांच्या विचारांची मशाल आपल्या मनात पेटवणे गरजेचे आहे. ज्या राजाने अठरा पगड जातींच्या हातांना काम दिले, ज्याने समतेची शिकवण दिली आणि ज्याने नीतिमत्तेचे राज्य स्थापन केले, त्या राजाचा वारसा चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सह्याद्रीच्या दगडाधोंड्यांनाही आजही तोच मंत्र स्मरतोय राजे आले आणि त्यांनी या मातीला माणूस म्हणून जगायला शिकवले.

केवळ इतिहासाचं पान नाही, तर जगण्याची नवी उमेद म्हणजे ‘शिवराय’. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म जपणारा राजा..!
ॲड जमील देशपांडे
