संकटं आली, आधार गेला… तरीही दोन मुलांसाठी लढत राहिली ही माय!

सिंगल मदर… संघर्षाची, जिद्दीची आणि ममतेची कहाणी

“परिस्थितीने मला तोडण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या मुलांसाठी मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले.”

लेखिका : गायत्री चौधरी

माझ्या आयुष्याची सुरुवातच एका संघर्षाने झाली. प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा घरच्यांचा विरोध होता. अनेक प्रश्न होते, अनेक अडचणी होत्या; पण मनात एक विश्वास होता—आपण मिळून आयुष्य उभं करू शकतो. त्या विश्वासावर मी माझ्या आयुष्याची नवी वाट निवडली.

२००६ पासून माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने संघर्षाची सुरुवात झाली. आयुष्याची शिदोरी बळकट होईल, सुखाचे दिवस येतील, अशी मनापासून इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एकामागून एक संकटं माझ्या आयुष्यात येत गेली. प्रत्येक संकटाने मला प्रश्न विचारला—“आता काय करणार?”

मी मात्र प्रत्येक वेळी एकच उत्तर दिलं—

“लढणार… आणि पुढे जाणार!”

सुमारे सतरा वर्षांचा संसार, अनेक चढ-उतार आणि असंख्य आठवणी मागे ठेवून माझे पती देवाज्ञा झाले. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एका क्षणात आयुष्याचा आधार हरपला. पण माझ्यासमोर दोन निरागस चेहरे होते—माझा मुलगा आणि माझी मुलगी.

त्या दोन मुलांसाठी मला पुन्हा उभं राहायचं होतं.

तेव्हापासून सुरू झाला माझ्या आयुष्यातील एक सिंगल मदर म्हणून संघर्ष.

सिंगल मदर होणं म्हणजे फक्त मुलांची जबाबदारी एकट्याने सांभाळणं नाही. त्यामागे असतात असंख्य रात्रींच्या चिंता, मनात दडवलेले अश्रू, समाजाचे प्रश्न, परिस्थितीशी केलेली तडजोड आणि उद्याची सततची काळजी.

आई म्हणून मुलांसमोर हसावं लागतं, जरी मन आतून रडत असलं तरी.

या प्रवासात मला समाजाने सिंगल मदरकडे कसं पाहिलं जातं, तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहिलं जातं, तिला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं—हे जवळून अनुभवायला मिळालं.

आयुष्यात अनेक वेळा कॉम्प्रमाईज केले. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. स्वतःपेक्षा मुलांच्या भविष्याचा विचार केला. परिस्थितीशी झगडत राहिले. कधी थकले, कधी कोसळले… पण पुन्हा उभी राहिले.

कारण मला माहीत होतं—

माझ्या मुलांसाठी मीच त्यांची ताकद आहे.

देवाने माझ्यासाठी काय लिहून ठेवलं होतं, हे मला तेव्हा कळत नव्हतं. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं—ज्या संकटांना मी माझं दुर्दैव समजत होते, त्याच संकटांनी मला अधिक मजबूत बनवलं.

आज मी अभिमानाने सांगू शकते—

“सिंगल मदर काय असते, हे पुस्तकातून नाही तर माझ्या आयुष्याकडून शिका.”

ही केवळ माझी कहाणी नाही. ही त्या प्रत्येक आईची कहाणी आहे, जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या मुलांसाठी उभी राहते.

जग काहीही म्हणो…

परिस्थिती कितीही कठीण असो…

आधार कितीही कमी असो…

आईची जिद्द आणि मुलांसाठीचं प्रेम तिला पुन्हा पुन्हा उभं करतं.

आज माझ्या संघर्षाकडे पाहताना मला एकच गोष्ट जाणवते—

**“मी परिस्थितीची शिकार नाही…

मी परिस्थितीवर मात करणारी एक आई आहे!”**

आणि माझा हा प्रवास अजून संपलेला नाही…

ही तर माझ्या संघर्षाची सुरुवात आहे.

— गायत्री चौधरी भाग 1

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *