महावितरणच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे, नागरिकांमध्ये तीव्र संताप
धाडस महाराष्ट्र न्यूज | विशेष वृत्त
निमखेडी शहरातील महावितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धाडस महाराष्ट्रच्या प्रतिनिधींनी कार्यालयाला भेट दिली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दरवाजाला टाळे लावलेले आढळून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून तक्रार निवारण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कार्यालयाच्या बाहेर तक्रार निवारण केंद्राचा फलक तसेच संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित क्रमांकांवर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याचवेळी काही नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या वाढीव वीजबिलांबाबतही गंभीर तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार जास्त वीजबिले येत असल्याने त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे मीटर तपासणीची मागणी केली. मात्र, “स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, त्यामुळे बिल भरावेच लागेल. अन्यथा घरातील जुनी उपकरणे बदलून नवीन घ्या किंवा वीज वापराची पद्धत बदला,” असे उत्तर मिळाल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, घरातील अनेक विद्युत उपकरणे बदलून, वीज वापरावर नियंत्रण ठेवूनही स्मार्ट मीटरनंतर वीजबिलांमध्ये अपेक्षित घट झालेली नाही. उलट अनेक ग्राहकांना जादा बिलांचा सामना करावा लागत असून त्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारी घेण्यासाठी किंवा त्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. वारंवार महावितरण कार्यालयात हेलपाटे मारूनही समस्यांचे समाधान होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाले असून त्यांना न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महावितरण प्रशासनाने या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेऊन स्मार्ट मीटरसंदर्भातील शंका दूर कराव्यात, वाढीव वीजबिलांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी आणि ग्राहकांना तत्पर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी केलेल्या आरोपांबाबत महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असेल आणि संबंधित तक्रारींवर कोणती कार्यवाही केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
