जळगाव-: जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२६ नियोजनाबाबत आढावा बैठक सोमवार ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत शेतकऱ्यांना आवश्यक असलेली गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व किटकनाशके यांसारख्या कृषी निविष्ठांची उपलब्धता, त्यांचे नियोजन तसेच गुणवत्ता नियंत्रणाबाबत उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. तसेच कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संलग्न विभागांच्या योजनांची अंमलबजावणी यावरही चर्चा होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, संलग्न विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार असून, खरीप हंगाम २०२६ साठी आवश्यक असलेल्या नियोजनाचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.













